Friday, 2 March 2018

स्वप्नातही आजकाल...

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात ... तेही रंगांवर...
'निळा' , 'भगवा' , 'हिरवा' अणि आता 'पांढरा' सुद्धा...
क्षितिजावरचा 'निळा' त्यांना दिसत नाही...
मावळतीचा 'भगवा' ते पाहत नाहीत...
माळरानातला 'हिरवा' त्यांना नको वाटतो
आणि आता तर 'पांढऱ्या' रंगावरही आक्षेप...!!!
असे 'दगड खावे लागतील' म्हणूनच कदाचित ;
सगळीकडे सामावलेली 'हवा' आणि 'पाणी'
'रंगहीन' आहेत ... दगड खाण्याचा प्रश्नंच येत नाही......

स्वप्नातही आजकाल...
दगड उचलले जातात... आदर्शांच्या स्मारकांवर...
आज 'हिंसक वृत्तीचे' दगड मारून उभे केले जाते
त्यांच्याच आदर्श कामावर प्रश्नचिन्ह...!!
ना 'ते' रंग जाणत होते ना कुठल्या 'घोषणा' ...
कळीचं फूल व्हावं म्हणून
आवश्यक ते पुरवत राहिले आणि ;
तो जो 'पुरवठा' होता त्यावरच आज
सारे भक्षकासारखे तुटून पडलेत ...
म्हणून ; ना ही कळीचं फूल होतंय ,
ना ही कळीचं अस्तित्व राहतंय...
न उमललेल्या फुलांच्या बागेत हेच ते दगड उचलणारे
पुन्हा गळाभेटी घेत बसतात ... तेही
आपापल्याच रंगांसोबत......

स्वप्नातले 'ते' दगड 'जातीच्या रकान्यावर' कधी उचलले जातील ???
रंगांवरची 'ती' दगडफेक 'धर्मांध विचारांवर' कधी होईल ???
आदर्शांच्या स्मारकावरच्या 'हिंसक माराच्या' खुणा
अंमलात न येणाऱ्या "समान नागरी _ _ _ " वर कधी दिसतील ???
स्वप्नातले 'ते' दगड 'पुरवठा' बनून
अस्तित्व हरवलेल्या कळ्यांचं फूल कधी बनवतील ???
कारण ;
फूलांनी बहरलेल्या बागेत
साऱ्या रंगांसोबत , आदर्शांच्या स्मारकांसमोर
समाजाला रंगपंचमी खेळताना पाहायचंय...
स्वप्नातल्या 'त्या' दगडांना वास्तवात फूल होताना पाहायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
साऱ्या रंगांना एकत्र येताना न्याहाळायचंय...
                               
                                  शामल दीपा
                shamaldeepa00@gmail.com

(सदरील कवितेस युवक महोत्सव 'युवारंग' - 2018/19 , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे.)
                         

Friday, 30 June 2017

' नाही म्हणतात 'आई-बाबा' आमच्याशी बोलताना......!! '

( आई वडील दोघेही शिक्षक असताना आम्हा मुलांच्या मनातील भावना काय असतात याचे वर्णन .... 
माझी स्वलिखित आणि स्वानुभवावर 
आधारित कविता ..... ) 

" सकाळी उठवते आई जिला भलतीच गडबड ,
बाबांना तर वेळच नसतो ऐकायला माझी बडबड ,
शिकवतात शे-दोनशे पोरांना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणतात आमच्याशी बोलताना ....

शाळेतलं शाळेत ठेऊन यायचं अशीच त्यांची शिकवण ,
आले की जरा चिड-चिड करतात तोच कंटाळवाणा क्षण ,
आम्हाला काही शाळेत हाताला धरून कोणी नेत नाही ,
पण समाज मात्र 'दोन पगारवाल्यांचं पोर' असाच
आमच्याकडे पाही ...

आम्हाला नाही ऐकू येत घरी गेले की 'सोनू'अशी आईची हाक,
घरी आले नसतं मिळत खायला गरम-गरम काहीतरी झ्याक ,
शाळेतील मुलांशी बोलून येता त्यामुळे तुम्ही खूप थकता ना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणता आमच्याशी बोलताना .....

रोज वाटतं आपल्यालाही आई वा बाबांनी शाळेत सोडावं ,
अन शिक्षकांना सरकारने लावलेल्या वेळेच्या
कुंपणाला तोडावं ,
अहो शासन मंडळी जरा आई-वडील आमचे
आमच्यासाठी द्या ना ,
पण घरी मात्र नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

कधी-कधी रविवारिही ड्युटीच यांची ,
'परीक्षेचे सुपरविजन' तर कधी घाई 'ज्यादा तासांची' ,
आई-बाबा तुम्ही कोणाचे हे मला सांगाल ना !
पण घरी मात्र नाही म्हणतात आई-बाबा
आमच्याशी बोलताना ....

कड्या-कुलुपं घालायला शिक्षकांची मुलं गुणवंत ,
कारण घरातून पडता बाहेर मुलेच त्यांची औक्षवंत ,
खरं तर सगळी जबाबदारी आणि समज मिळतो
आम्हाला 'गर्भातच' ,
गप्पांसाठी वेळ आम्हाला संध्याकाळी मिळाला तरंच ....

तरी नशीब शासनाने सगळ्याच 'वसतिशाळा' नाही ठेवल्या ,
नाहीतर शिक्षकांची मुलं म्हणजे 'सनाथ' असून असती 'अनाथ बावल्या' ,
ते कसलं 'इलेक्शनचं ट्रेनिंग' आणि 'ड्युटीनं' आम्हाला नकोसं वाटतं ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

शाळेतून घरी आल्यावर नाही होत आमची लवकर भेट ,
आई-बाबा घरी यायला सहाच वाजतात थेट ,
संध्याकाळी तर आमचा 'अभ्यास' , आणि 'स्टडी' ची वेळ ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....

पालकांचे आले फोन तर लगेच मूड चांगला करून बोलतात ,
माझे आई-बाबा 'पालक मिटिंग' ला मला माझ्या
शाळेत यावेसे वाटतात ,
पण तेंव्हाच नेमकं त्यांचं 'ट्रेनिंग' कसं येतं कळतंच नाही ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

आजारी पडलो आम्ही तर कुठे रजा टाकून घरी असतात ,
तेव्हा मात्र 'धावपळ स्टॉप' आणि 'अश्रू' त्यांचे गळतात ,
म्हणून वाटतं सारखं-सारखं आजारी पडावं अन भेटावं
'आई बाबांना' ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....

कट-कट शाळेतली ऐकून ते बिचारे थकतात हो ,
मात्रं यांची शाळेची बोलणी ऐकून फोडावा वाटतो टाहो ,
कोणीतरी आमचा विचार करून पहा ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!! "

                                            शामल
                  shamaldeepa00@gmail.com

Wednesday, 28 June 2017

' न साहनारा आईचा अबोला '


 " नाही गं सहन होत आई हा अबोला तुझा
सांगूनच चुकले अंतर्मनातील भाव सारा माझा ,
त्या चार गोष्टी आणि ते मोकळे बोलणे कसे गं विसरू 
मनातील तुझ्या रुसवा कसा मी नष्ट करू !!

तुझे कोमल बोलणे आणि सुंदर हसणे 
तुझ्या डोळ्यांतील अश्रू सांगतात तुझे बोलणे ,
जन्म दिलास तू खूप वेदना सहन करून 
माफी मागते गं त्या वेदनांची जाणीव ठेवून...

चुकले माझेच पण अश्रू तू का साहतेस ??
तुझ्या अश्रूंनी वार माझ्या काळजावर करतेस ,
तूच सोबती , तूच मन , 'तूच' माझी आहेस ,
मी तुझी 'सावली' असे तूच एकदा वदलेस...

विश्वास माझा तुझ्यावरचा अजूनही तसाच आहे 
तू मात्र अशी 'अश्रूंनी चिंब' हे मला न साहे ,
परतुनी ये माझ्या माऊली तू माझ्यासाठी 
मी जन्मच घेतलाय 'फक्त तुझ्यासाठी'....

फेडू कसे ऋण मी तुझे कळतंच नाही 
प्रेम तुझे नि माझे नेहमी अथांग राही ,
सोड गं राग अन अश्रू डोळ्यांतले 
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले ......
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले......"

                                  शामल
           Shamaldeepa00@gmail.com